असेच जरा पहुडले होते पण मनात विचारांचे चक्र चालू झाले. म्हणतात ना मनाचा वेग वार्याहूनही जास्त. तसेच झाले बघा, उडत उडत बालपणात गेले. सहज काही आठवणी आल्या बालपणीच्या आणि चेहर्यावर हसू उमटले.
लहानपणापासूनच मी जरा (जास्तच) ईष्याळु होते. बहिणीपेक्षा माझेच लाड कसे होतील याकडे माझे जास्त लक्ष असायचे. आई-बाबांची गुणी पोर होण्यासाठी मी वाट्टेल ते करण्यास तयार असायची. आई-बाबा, आजी-आजोबा, हे फक्त माझेच असावेत त्यासाठी बहिणीशी खूप भांडत होते. बहिणीचे कौतुक केले की मी किती वरचढ ते सिद्ध करायला जायचे. स्वभावच झाला होता स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा. कोणी मैत्रीण फार आवडत असेल तर ती फक्त माझीच राहायला हवी. तिने दुसर्या मैत्रिणीशी संबंधही ठेवायला नको असे मला वाटायचे. पण जर असे झाले तर त्या दुसरीला खाऊ की गिळू या भावनेने कधी स्वतःजवळ येऊच दिले नाही. बहिणीशी खूप भांडले पण जेव्हा तिचं लग्नं ठरलं तर जीजाजींवर फार राग आला, माझ्या बहिणीला आमच्यापासून दूर नेतील म्हणून. आधी चांगली मुलगी म्हणतील म्हणून बहिणीशी स्पर्धा, लग्नानंतर चांगली सून म्हणतील म्हणून जावांशी स्पर्धा, इतकंच नव्हे तर नवर्याची बेस्ट फ्रेंड पण ईर्षेपोटी त्याच्यापासून तोडली, क्रूरपणाचा कळस गाठला नेहमीच. आणि हा अट्टाहास कशापायी तर मी ज्यांच्यावर प्रेम करते ते माझेच राहावे, त्यांच्या जीवनात माझ्या व्यतिरिक्त कोणाचेच महत्व न राहो म्हणून. मैत्रिणींमध्ये, समाजात स्वतःला किती चांगले हे सिद्ध करण्यामागे कितीदा आवाकाबाहेर प्रयत्न करावे लागले, खूप श्रम पडले. पण मिळवले मनात होते ते आणि ज्यांच्यासाठी आपण एवढे जीवापाड प्रयत्न करीत असतो तेही आपल्याला तसाच प्रतिसाद देतील ही अपेक्षा ठेवणे आलेच. पण तसे कधीच घडले नाही, प्रत्येक वेळी अपेक्षा भंग झाल्याचे दुःख सोसावे लागायचे आणि एवढं करूनही मन समाधानी का नव्हते, ते काही केल्या कळत नव्हते?
मग सहज काही ओळी वाचनात आल्या 'नात्यांना पाखरांसारखं जपावं. मालकी हक्क गाजविण्यासाठी पिंजर्यात डांबू नये. जी उडून जातील ती नाती आपली नव्हतीच, जी आपली असतील ती कधीच उडून जाणार नाही.' आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. इतकी वर्षे काय चुकत होते ते जाणवले. मग सर्व खोटेपणा सोडण्याचा निर्णय घेतला, जशी मी आहे तशीच जगाच्या आणि आपल्या माणसांच्या सामोरे जाईन, जो माझा स्वीकार करेल तो माझा नाही तर सोडून द्यायचे. आणि तसे वागूही लागले. मी आहे तशी जगण्यास सुरुवात केली. आता मला कोणालाही गमाविण्याची भीती नाही, कोणाला मिळविण्याची इच्छाही नाही, जबाबदार्या संपत नाहीत, कर्तव्य करायचे पण कोणाशीही अपेक्षा ठेवणे टाळू लागले, समाधानी झाले, इतकी वर्षे जो आनंद गमावून बसले होते, तो मिळविला. कोणाकडून कुठल्याही अपेक्षा राहिल्या नाही तर त्या भंग होण्याचा प्रश्नच उरत नाही. चांगले म्हटले तरी आणि वाईट म्हटले तरी आता फारसे काही वाटत नाही, स्वतःवर प्रेम करू लागले आहे, जीवनाचा वसंत अनुभवत आहे. सुखी जीवनाचा हा मंत्र मला उलगडला आहे. तुम्ही घेतला का तुमच्या मंत्राचा शोध?