सध्या मनात खूप विरक्तीची भावना आलेली आहे. संसारात मन रमत नाही, नेटवर जास्त वेळ सर्फिंग जमत नाही, लगेच उदास वाटू लागतं, हे डिप्रेशनची लक्षणे वाटू शकतील. सर्व काही सोडून एकांतवासात निघून जावे असेच वाटते. अशा जागी जिथे एकही ओळखीची व्यक्ती नसेल, फोन नसेल, टी.व्ही. नसेल, कॉम्प्युटर-नेट काहीही नसेल. एखाद्या गुहेत शांत बसून राहायचे, पक्ष्यांची किलबिलाट नको, पानांचा आवाज नको, वार्याची झुलूक असली तरी आवाज न करता, कुठल्याही आवाजाचा Disturbance नकोच, तिथे फक्त मला स्वतःमध्ये राहायचं आहे. असं ऐकलं आहे की माणसाच्या आतच सगळी सृष्टी दडलेली आहे, ही बाह्य सृष्टी नाकारून आतल्या सृष्टीत प्रवेश करावेसे वाटते, ते काय गूढ आहे ते जाणून घ्यायचे आहे. इथले नाते-संबंध, भौतिक गोष्टींचा वीट आला आहे, आता कुठेतरी दूर पळून जावेसे वाटते. कधी कधी मनात एक weird कल्पना येते, माझा एक्सिडेंट झाला आणि स्मरणशक्तीच हरवली तर? हे जग माझ्यासाठी अनोळखी होईल पण एक समस्या उद्भवेल, असे झाले तर मी स्वतःला पण ओळखणार नाही आणि मग मला माझी या भौतिक शरीराची ओळख मिळविण्यासाठी धडपड करावी लागेल आणि सध्या जसा मला प्रवास करावासा वाटतोय तो राहूनच जाईल, स्वतःचं अस्तित्व माहिती नसताना माणसाची स्थिती किती केविलवाणी होत असेल? नको, नको, कोणावरही अशी परिस्थिती येऊ नको देऊ रे देवा! मी आहे तेच उत्तम. अशी भौतिक ओळख माहिती असताना ‘स्व’ची ओळख करून घेण्याचा प्रवास हा अप्रतिम असणार ह्यात शंकाच नाही. बघू किती लवकर असा प्रवास घडतोय ते!!!
Saturday, October 29, 2011
Thursday, October 27, 2011
फोन मॅनर्स
आज सकाळी सासुबाईंनी फोन करण्यास एक नंबर डायल केला तर पलिकडून एका बाईचा आवाज ऐकू आला, त्यांच्या ओळखीचा वाटला नाही. त्यांनी विचारलं कोण बोलतंय?' त्या बाईनी प्रतिप्रश्न केला 'आपण कुठून बोलताय' सासुबाई म्हणाल्या 'अमुक गावावरून' तर तिने म्हटले ''राँग नंबर'' आणि फोन ठेऊन दिला, मग त्यांनी नीट तपासून पुन्हा नंबर डायल केला आणि ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा होता तिच्याशी बोलणं झालं. थोड्या वेळाने त्या राँग नंबरवरून एका पुरुषाचा फोन आला त्याने म्हटले ‘कशा आहात आपण?’ ‘काय म्हणतंय तुमचं शहर?’ आई म्हणाल्या – ‘ठीक आहे, सगळं मजेत आहे.’ मग त्याने दसर्याच्या शुभेच्छा दिल्या आणि मग फोन आधीच्या बाईकडे दिला ती म्हणाली ‘क्षमा करा मी आपणास ओळखू शकले नाही. कशा आहात आपण वगैरे...............’
ह्या तिघांनी समोरच्याची ओळख विचारलीसुद्धा नाही आणि हे वरील मजेशीर संभाषण करून घेतले. हा एक प्रसंग हसण्यावारी नेता येईल, पण मी विचारात पडले जर आपण समोरच्याला ओळखू नाही शकलो तर त्याला ही गोष्ट सांगण्यात लाजायचं कशाला? जगात आपण कित्येक लोकांना भेटतो, प्रवासात, बाजारात, पब्लिक प्लेस, समारंभ इत्यादी. सर्वांचेच चेहरे, नाव आणि आवाज लक्षात राहतीलच हे शक्य नाही, ज्यांची स्मरणशक्ती अफाट असेल त्यांच सोडा पण सर्वसामान्य माणसासाठी प्रत्येकाचे चेहरे-नाव-आवाज लक्षात ठेवणे जरा कठिणच असते.
एक अजून प्रसंग आठवला, माझे एक ओळखीचे आहेत जे केटरर्सचं काम करतात, त्यांना लोकं फोन करून असे ऑर्डर देतात – ‘अगं अमुक तमुक, माझा 2 किलो चिवडा आणि 3 किलो चकली किंवा ....... किती होतील? कधी घ्यायला येऊ?’ झालं बोलून.............
आता ही गोष्ट वेगळी की त्या वहिनींना आवाजावरून व्यक्ती ओळखता येते पण फोन करताना लोकांना कोडं घालायची खूप वाईट खोड असते. असंच एक प्रसंग आठवला, फोनच्या दुसर्या बाजुने आवाज आला ‘हॅलो, मी दिनेश बोलतोय, काय दादा कसे आहात?’ आता हा कोणता दिनेश? म्हणजे लेल्यांचा की ऑफिसचा की मागच्या आठवड्यात भेटला तो? फोनवर हॅलो बोलताच ‘आणखी काय म्हणता?’ वगैरे सर्रास बोलायला सुरुवात करतात, अगदी पहिल्यांदा फोन करणारेसुद्धा. फोन करताना मी हा, इथून बोलतोय वगैरे पद्धतच नसते, कुठे आग लागलेली नसते की तुम्हाला विहीर खणायला बोलावले नसते मग एक वाक्य बोलून सुरुवात करायला काय जाते? कित्येकदा आपल्याकडे एखाद्याचा नंबर सेव्ह असतो पण समोरच्याकडेही आपला नंबर सेव्ह असेलच हे कशावरून? असला किंवा नसला तरी ओळख देऊन बोलणे कधीही चांगले. अगदी घरच्यांनाही फोन केल्यावर ‘अगं आई! मी........बोलते’ किंवा नातेवाईकांना फोन करताना ‘नमस्कार रामभाऊ! मी नागपूरवरून जनार्दन बोलतोय.’ आणि मग पुढचे संभाषण करावे.
आता हे कित्येकांना पटतं काय माहिती? कळेल पण वळणार नाही तरी ह्या लेखाने तुम्हाला विचार करण्यास भाग पाडले असेल तर मिळवलं.
Subscribe to:
Comments (Atom)