Saturday, October 29, 2011

प्रवास

सध्‍या मनात खूप विरक्‍तीची भावना आलेली आहे. संसारात मन रमत नाही, नेटवर जास्‍त वेळ सर्फिंग जमत नाही, लगेच उदास वाटू लागतं, हे डिप्रेशनची लक्षणे वाटू शकतील. सर्व काही सोडून एकांतवासात निघून जावे असेच वाटते. अशा जागी जिथे एकही ओळखीची व्‍यक्‍ती नसेल, फोन नसेल, टी.व्‍ही. नसेल, कॉम्‍प्‍युटर-नेट काहीही नसेल. एखाद्या गुहेत शांत बसून राहायचे, पक्ष्‍यांची किलबिलाट नको, पानांचा आवाज नको, वार्‍याची झुलूक असली तरी आवाज न करता, कुठल्‍याही आवाजाचा Disturbance नकोच, तिथे फक्‍त मला स्‍वतःमध्‍ये राहायचं आहे. असं ऐकलं आहे की माणसाच्‍या आतच सगळी सृष्‍टी दडलेली आहे, ही बाह्य सृष्‍टी नाकारून आतल्‍या सृष्‍टीत प्रवेश करावेसे वाटते, ते काय गूढ आहे ते जाणून घ्‍यायचे आहे. इथले नाते-संबंध, भौतिक गोष्‍टींचा वीट आला आहे, आता कुठेतरी दूर पळून जावेसे वाटते. कधी कधी मनात एक weird कल्‍पना येते, माझा एक्सिडेंट झाला आणि स्‍मरणशक्‍तीच हरवली तर? हे जग माझ्यासाठी अनोळखी होईल पण एक समस्‍या उद्भवेल, असे झाले तर मी स्‍वतःला पण ओळखणार नाही आणि मग मला माझी या भौतिक शरीराची ओळख मिळविण्‍यासाठी धडपड करावी लागेल आणि सध्‍या जसा मला प्रवास करावासा वाटतोय तो राहूनच जाईल, स्‍वतःचं अस्तित्‍व माहिती नसताना माणसाची स्थिती किती केविलवाणी होत असेल? नको, नको, कोणावरही अशी परिस्थिती येऊ नको देऊ रे देवा!  मी आहे तेच उत्तम. अशी भौतिक ओळख माहिती असताना ‘स्‍व’ची ओळख करून घेण्‍याचा प्रवास हा अप्रतिम असणार ह्यात शंकाच नाही. बघू किती लवकर असा प्रवास घडतोय ते!!!

Thursday, October 27, 2011

फोन मॅनर्स

आज सकाळी सासुबाईंनी फोन करण्‍यास एक नंबर डायल केला तर पलिकडून एका बाईचा आवाज ऐकू ला, त्‍यांच्‍या ओळखीचा वाटला नाही. त्‍यांनी विचारलं कोण बोलतंय?'  त्‍या बाईनी प्रतिप्रश्‍न केला 'आपण कुठून बोलताय' सासुबाई म्‍हणाल्‍या 'अमुक गावावरूनतर तिने म्‍हटले ''राँग नंबर'आणि फोन ठेऊन दिलामग त्‍यांनी नीट तपासून पुन्‍हा नंबर डायल केला आणि ज्‍या व्‍यक्‍तीशी संवाद साधायचा होता तिच्‍याशी बोलणं झालं. थोड्या वेळाने त्‍या राँग नंबरवरून एका पुरुषाचा फोन आला त्‍याने म्‍हटले ‘कशा आहात आपण?’ ‘काय म्‍हणतंय तुमचं श‍हर?’ आई म्‍हणाल्‍या – ‘ठीक आहे, सगळं मजेत आहे.’ मग त्‍याने दसर्‍याच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आणि मग फोन आधीच्‍या बाईकडे दिला ती म्‍हणाली ‘क्षमा करा मी आपणास ओळखू शकले नाही. कशा आहात आपण वगैरे...............’
ह्या तिघांनी समोरच्‍याची ओळख विचारलीसुद्धा नाही आणि हे वरील मजेशीर संभाषण करून घेतले. हा एक प्रसंग हसण्‍यावारी नेता येईल, पण मी विचारात पडले जर आपण समोरच्‍याला ओळखू नाही शकलो तर त्‍याला ही गोष्‍ट सांगण्‍यात लाजायचं कशाला? जगात आपण कित्‍येक लोकांना भेटतो, प्रवासात, बाजारात, पब्लिक प्‍लेस, समारंभ इत्‍यादी. सर्वांचेच चेहरे, नाव आणि आवाज लक्षात राहतीलच हे शक्‍य नाही, ज्‍यांची स्‍मरणशक्‍ती अफाट असेल त्‍यांच सोडा पण सर्वसामान्‍य माणसासाठी प्रत्‍येकाचे चेहरे-नाव-आवाज लक्षात ठेवणे जरा कठिणच असते.
  एक अजून प्रसंग आठवला, माझे एक ओळखीचे आहेत जे केटरर्सचं काम करतात, त्‍यांना लोकं फोन करून असे ऑर्डर देतात – ‘अगं अमुक तमुक, माझा 2 किलो चिवडा आणि 3 किलो चकली किंवा ....... किती होतील? कधी घ्‍यायला येऊ?’ झालं बोलून.............
आता ही गोष्‍ट वेगळी की त्‍या वहिनींना आवाजावरून व्‍यक्‍ती ओळखता येते पण फोन करताना लोकांना कोडं घालायची खूप वाईट खोड असते. असंच एक प्रसंग आठवला, फोनच्‍या दुसर्‍या बाजुने आवाज आला ‘हॅलो, मी दिनेश बोलतोय, काय दादा कसे आहात?’ आता हा कोणता दिनेश? म्‍हणजे लेल्‍यांचा की ऑफिसचा की मागच्‍या आठवड्यात भेटला तो? फोनवर हॅलो बोलताच ‘आणखी काय म्‍हणता?’ वगैरे सर्रास बोलायला सुरुवात करतात, अगदी पहिल्‍यांदा फोन करणारेसुद्धा. फोन करताना मी हा, इथून बोलतोय वगैरे पद्धतच नसते, कुठे आग लागलेली नसते की तुम्‍हाला विहीर खणायला बोलावले नसते मग एक वाक्‍य बोलून सुरुवात करायला काय जाते? कित्‍येकदा आपल्‍याकडे एखाद्याचा नंबर सेव्‍ह असतो पण समोरच्‍याकडेही आपला नंबर सेव्‍ह असेलच हे कशावरून? असला किंवा नसला तरी ओळख देऊन बोलणे कधीही चांगले. अगदी घरच्‍यांनाही फोन केल्‍यावर ‘अगं आई! मी........बोलते’ किंवा नातेवाईकांना फोन करताना ‘नमस्‍कार रामभाऊ!  मी नागपूरवरून जनार्दन बोलतोय.’ आणि मग पुढचे संभाषण करावे.
आता हे कित्‍येकांना पटतं काय माहिती? कळेल पण वळणार नाही तरी ह्या लेखाने तुम्‍हाला विचार करण्‍यास भाग पाडले असेल तर मिळवलं.

Wednesday, February 16, 2011

सुखी जीवनाचा मंत्र

      असेच जरा पहुडले होते पण मनात विचारांचे चक्र चालू झाले. म्‍हणतात ना मनाचा वेग वार्‍याहूनही जास्‍त. तसेच झाले बघा, उडत उडत बालपणात गेले. सहज काही आठवणी आल्‍या बालपणीच्‍या आणि चेहर्‍यावर हसू उमटले.

      लहानपणापासूनच मी जरा (जास्‍तच) ईष्‍याळु होते. बहिणीपेक्षा माझेच लाड कसे होतील याकडे माझे जास्‍त लक्ष असायचे. आई-बाबांची गुणी पोर होण्‍यासाठी मी वाट्टेल ते करण्‍यास तयार असायची. आई-बाबा, आजी-आजोबा, हे फक्‍त माझेच असावेत त्‍यासाठी बहिणीशी खूप भांडत होते. बहिणीचे कौतुक केले की मी किती वरचढ ते सिद्ध करायला जायचे. स्‍वभावच झाला होता स्‍वतःचे अस्तित्‍व दाखविण्‍याचा. कोणी मैत्रीण फार आवडत असेल तर ती फक्‍त माझीच राहायला हवी. तिने दुसर्‍या मैत्रिणीशी संबंधही ठेवायला नको असे मला वाटायचे. पण जर असे झाले तर त्‍या दुसरीला खाऊ की गिळू या भावनेने कधी स्‍वतःजवळ येऊच दिले नाही. बहिणीशी खूप भांडले पण जेव्‍हा तिचं लग्‍नं ठरलं तर जीजाजींवर फार राग आला, माझ्या बहिणीला आमच्‍यापासून दूर नेतील म्‍हणून. आधी चांगली मुलगी म्‍हणतील म्‍हणून बहिणीशी स्‍पर्धा, लग्‍नानंतर चांगली सून म्‍हणतील म्‍हणून जावांशी स्‍पर्धा, इतकंच नव्‍हे तर नवर्‍याची बेस्‍ट फ्रेंड पण ईर्षेपोटी त्‍याच्‍यापासून तोडली, क्रूरपणाचा कळस गाठला नेहमीच. आणि हा अट्टाहास कशापायी तर मी ज्‍यांच्‍यावर प्रेम करते ते माझेच राहावे, त्‍यांच्‍या जीवनात माझ्या व्‍यतिरिक्‍त कोणाचेच महत्‍व न राहो म्‍हणून. मैत्रिणींमध्‍ये, समाजात स्‍वतःला किती चांगले हे सिद्ध करण्‍यामागे कितीदा आवाकाबाहेर प्रयत्‍न करावे लागले, खूप श्रम पडले. पण मिळवले मनात होते ते आणि ज्‍यांच्‍यासाठी आपण एवढे जीवापाड प्रयत्‍न करीत असतो तेही आपल्‍याला तसाच प्रतिसाद देतील ही अपेक्षा ठेवणे आलेच. पण तसे कधीच घडले नाही, प्रत्‍येक वेळी अपेक्षा भंग झाल्‍याचे दुःख सोसावे लागायचे आणि एवढं करूनही मन समाधानी का नव्‍हते, ते काही केल्‍या कळत नव्‍हते?
            मग सहज काही ओळी वाचनात आल्‍या 'नात्‍यांना पाखरांसारखं जपावं. मालकी हक्‍क गाजविण्‍यासाठी पिंजर्‍यात डांबू नये. जी उडून जातील ती नाती आपली नव्‍हतीच, जी आपली असतील ती कधीच उडून जाणार नाही.' आणि डोक्‍यात लख्‍ख प्रकाश पडला. इतकी वर्षे काय चुकत होते ते जाणवले. मग सर्व खोटेपणा सोडण्‍याचा निर्णय घेतला, जशी मी आहे तशीच जगाच्‍या आणि आपल्‍या माणसांच्‍या सामोरे जाईन, जो माझा स्‍वीकार करेल तो माझा नाही तर सोडून द्यायचे. आणि तसे वागूही लागले. मी आहे तशी जगण्‍यास सुरुवात केली. आता मला कोणालाही ग‍माविण्‍याची भीती नाही, कोणाला मिळविण्‍याची इच्‍छाही नाही, जबाबदार्‍या संपत नाहीत, कर्तव्‍य करायचे पण कोणाशीही अपेक्षा ठेवणे टाळू लागले, समाधानी झाले, इतकी वर्षे जो आनंद गमावून बसले होते, तो मिळविला. कोणाकडून कुठल्‍याही अपेक्षा राहिल्‍या नाही तर त्‍या भंग होण्‍याचा प्रश्‍नच उरत नाही. चांगले म्‍हटले तरी आणि वाईट म्‍हटले तरी आता फारसे काही वाटत नाही, स्‍वतःवर प्रेम करू लागले आहे, जीवनाचा वसंत अनुभवत आहे. सुखी जीवनाचा हा मंत्र मला उलगडला आहे. तुम्‍ही घेतला का तुमच्‍या मंत्राचा शोध?


Monday, January 17, 2011

हौस

लोकांना झाडावरची फुलं तोडून देवावर वाहायची भारी हौस असते. देवघर सुंदर दिसते पण झाडं कुरुप दिसू लागतात. ती फुलं तिथेच राहिली की झाडं आणि परिसर अजून सुंदर नाही का दिसणार? झाडावरची फुले ओरबाडून घेताना त्‍या लोकांना त्‍यांच्‍या मनाची साथ लाभत असेल का? कोणी म्‍हणेल की झाडं तर असतातच फुले द्यायला, ती तोडली तर त्‍यात काय? अरे, पण कोणी देत असेल म्‍हणून सतत घेत राहावे का? नवीन फुलं उमलली की जुनी त्‍यांना उमलण्‍यास जागा करून देतात, ती गळून पडतात. गळून पडण्‍यापूर्वी त्‍यांना तोडली तरी एक वेळ चालेल. पण टवटवीत फुलं, कळ्या हे सर्व का तोडायचे? झाडाची मुलं-बाळंच तर असतात ती! त्‍यांच्‍या जन्‍मदात्‍यांकडून त्‍यांना तोडायचे! किती निष्‍ठुरपणा आहे हा! आणि स्‍वतः लावलेली फुलं तोडली तर माझे काही म्‍हणणे नाही, ती तुमची मर्जी. अरे, पण इतरांनी लावलेली फुलंही तुम्‍ही न विचारता तोडून नेता. काय म्‍हणावं तुमच्‍या या हौसेला?